थ्रोम्बोसिस म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 16:52

थ्रॉम्बोसिस म्हणजे काय? रक्ताच्या गुठळ्या होणाऱ्या या विकारात होऊ शकतात असे गंभीर परिणाम

थ्रॉम्बोसिस म्हणजे सर्वसामान्य भाषेत रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी (थ्रॉम्बस) तयार होणं. निदानाविना दुर्लक्षित आजार आहे, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. रक्त गोठवणारे घटक नियंत्रणात ठेवणारा एक समतोल शरीरात निसर्गत:च साधला जात असतो. म्हणूनच एखादी इजा झाली तरच रक्त गोठतं. पण डीव्‍हीटी (डीप व्हेन थ्रॉम्बोसिस) मध्ये बाहेरून सुस्थितीत असलेल्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी तयार होते. डीव्‍हीटी ही समस्या इतकी प्राणघातक का आहे? हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला डीप व्हेन्स म्हणजे नेमकं काय? हे समजून घ्यावं लागेल. डीप व्हेन्स म्हणजे इतर नसांच्या तुलनेत त्वचेच्या खूप आत (खोलवर) असणाऱ्या नसा. अशा एखाद्या डीप व्हेनमध्ये गुठळी निर्माण झाली व त्यावर उपचार झाले नाहीत, तर ती शरीराच्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये प्रवेश करू शकते. तिथून प्रवास करत शरीराच्या इतर भागांत पोहोचून तिथे अडकू शकते (याला एम्बोलिझम असे म्हणतात) उदा. ही गुठळी हृदयात जाऊ शकते आणि हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरू शकते; ती मेंदूमध्ये अडकल्यास स्ट्रोक येऊ शकतो किंवा फुफ्फुसात गेल्यास पल्मोनरी एम्बोलिझमची समस्या निर्माण होऊ शकते.

शरीरामध्ये गुठळी निर्माण होण्याची तीन प्रमुख कारणं आहेत. शरीराच्या नियंत्रित किंवा मर्यादित हालचालीमुळे रक्त थिजणं, रक्तवाहिनी विशेषत: तिच्या आतल्या अस्तराला दुखापत होणं (एन्डोथेलियम) किंवा रक्त गोठण्याचा गुणधर्म वाढीस लागणं. सध्या कोविडमुळे लोकांची हालचाल कमी झाली आहे. यामुळे डीव्‍हीटीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

शरीराच्या हालचालींवर मर्यादा आली की रक्त साचण्याची समस्या निर्माण होते. कोविडमुळे डीव्‍हीटीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे आणि करोना विषाणूमुळे रक्त साकळण्याचा गुणधर्म वाढीस लागणं हे त्याचं एकमेव कारण नाही. तर या काळात घरोघरी अडकलेल्या लोकांच्या हालचालींवर मर्यादा आली आहे. त्यामुळेही रक्तामध्ये गुठळी तयार होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

उपचार आणि प्रतिबंध
डीव्‍हीटीच्या समस्येचा धोका असलेल्या व्यक्तींनी खूप वेळ एकाच जागी राहणं टाळायला हवं. पायांना सतत व्यायाम देत राहणं आणि रक्त पातळ करणारी (अँटी कोग्युलन्ट्स) औषधं घेणं हे डीव्‍हीटीच्या प्रतिबंधासाठी आवश्यक आहे. डीव्‍हीटीवरील उपचारांचे तीन मार्ग म्हणजे रक्तातील गुठळी विरघळवणं, शस्त्रक्रियेनं अशी गुठळी काढून टाकणं किंवा ती स्वत:हूनच नाहीशी होण्याची वाट पाहणं.

रुग्णांमध्ये पुरेशी जागरुकता असेल तर थ्रॉम्बोसिसचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येणं शक्य आहे. कारण आता प्रगत औषधोपचारांमुळे ही समस्या परिणामकारकरित्या सोडवता येते. धाप लागणं, अंगात तापाची कणकण आणि पाय किंवा घोट्याच्या भागात सूज अशी लक्षणं एकाच वेळी दिसून येत असतील तर अशा रुग्णाने तत्काळ वैद्यकीय मदत घेणं महत्त्वाचं आहे. रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या साहाय्याने प्रतिबंधात्मक उपाय करणं. यामुळे रुग्णाचं जीवनमान लक्षणीयरित्या सुधारू शकतं.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info